रावेर दि .16 (प्रतिनिधी) रावेर तालुक्यातील रसलपूर व बक्षीपूर ग्रामपंचायतीतील कथित गैरकारभार आणि अनियमिततेबाबत पंचायत समितीकडे तक्रारी दाखल होऊन बराच कालावधी उलटला असतानाही चौकशीची प्रक्रिया अजून ही सुरू झालेली नाही. ग्रामस्थांकडून वारंवार पाठपुरावा करून ही संबंधित प्रकरणात कोणती ही ठोस हालचाल दिसून येत नसल्याने नाराजी वाढू लागली आहे.
दरम्यान विवरे ॥ बु ॥ येथे दोन विस्तार अधिकारी जाऊन तातडीने प्राथमिक चौकशी करून आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पंचायत समितीच्या चौकशी प्रक्रियेबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. एका बाजूला गंभीर तक्रारी असून ही चौकशी रखडलेली, तर दुसरीकडे अचानक तातडीने चौकशी या वेगळ्या निकषा मुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केला जात आहे.
रसलपूर व बक्षीपूर ग्रामपंचायतीतील विविध विकास कामांमध्ये अनियमितता झाल्याच्या तक्रारी नागरिकांनी संबंधित विभागाकडे दिल्या आहेत. या तक्रारींची चौकशी करण्यासाठी विस्तार अधिकाऱ्यांवर अतिरिक्त कामांचा ताण असल्याचे कारण सांगितले जात आहे. मात्र विवरे ॥बु ॥ येथे दोन अधिकाऱ्यांची तातडीने भेट दिल्याने नागरिकांकडून दुजाभावाचा आरोप होत आहे.
रावेर पंचायत समितीला ISO नामांकन मिळाले असले तरी लोकांच्या तक्रारींवर तातडीने कारवाई होत नसल्याने या नामांकनाच्या कार्यक्षमतेवर ही प्रश्न उपस्थित होत आहेत. सर्व तक्रारींची समान निकषांवर पारदर्शक चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
रसलपूर-बक्षीपूर तक्रारी असूनही चौकशी का रखडली ?
विवरे ॥ बु ॥ येथे अचानक दोन विस्तार अधिकारी का दाखल झाले ?
चौकशीसाठी वेगळे निकष लावले जात आहेत का ?
पंचायत समितीच्या कारभारात पारदर्शकता आहे का ?
नागरिकांची प्रतिक्रिया
“तक्रारी सर्व गावांच्या आहेत, चौकशीचा वेग वेगवेगळा का?”
संतप्त ग्रामस्थ – रसलपुर , बक्षीपुर
























