रावेर, दि. 30 (प्रतिनिधी)- पुनखेडा-पातोंडी या महत्त्वाच्या मार्गाचे काम अपूर्ण राहिल्याने नागरिक आणि शेतकरी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले असून सैल खडीमुळे वाहतूक करणे धोकादायक बनले आहे.
या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात शेतीमालाची वाहतूक केली जाते. तसेच शाळेच्या बसेस आणि अतुर्ली-मुक्ताईनगर परिसरातील नागरिकांची नियमित ये-जा सुरू असते. मात्र, डांबरीकरण न झाल्याने वाहनांच्या हालचालीदरम्यान मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे.
उडणाऱ्या धुळीचा थेट परिणाम शेतातील पिकांवर होत असून पिकांवर धुळीचा थर साचून त्यांच्या वाढीवर विपरीत परिणाम होत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. याशिवाय, उडणारी खडी आणि धुळीमुळे दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना वाहन चालवताना मोठा धोका निर्माण झाला आहे.
या परिस्थितीमुळे अपघाताची शक्यता वाढली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, या गंभीर समस्येकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष घालून रस्त्याचे अपूर्ण काम पूर्ण करून लवकरात लवकर डांबरीकरण करावे, अशी जोरदार मागणी नागरिक आणि शेतकरी वर्गातून होत आहे.
























