मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय किसन पाटील यांच्या निवासस्थानी बैठक घेऊन शेतकरी, भाजपा कार्यकर्ते व नागरिकांशी संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांनी सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती उद्ध्वस्त होत असल्याची व्यथा मांडली.
केळी, मका व कपाशी या पिकांना मिळणाऱ्या अत्यल्प दरामुळे शेतकऱ्यांवर दुहेरी आर्थिक संकट कोसळल्याचे सांगण्यात आले. यामुळे सावरणे कठीण झाल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, अंतुर्ली गावात व परिसरात वादळामुळे झाडे पडून घरे उध्वस्त झाली, छप्पर उडाले; मात्र अनेक ठिकाणी पंचनामे झाले नसल्याची तक्रार नागरिकांनी केली. यावर रक्षा ताई खडसे यांनी महसूल विभागातील तलाठी श्री मराठे व ग्रामसेवक यांना तात्काळ पंचनामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

तसेच इच्छा पूर्ण फाटा, अंतुर्ली गाव व बेलसवाडी रोड परिसरात वाढत्या गावठी दारू, ताडी, सट्टा, पत्ता व गांजा व्यवसायाबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. यावर अंतुर्ली आउटपोस्टचे हेड कॉन्स्टेबल श्री भोई यांना बोलावून कडक शब्दांत कारवाईचे आदेश देण्यात आले. “या अवैध व्यवसायामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत असून तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे, तात्काळ कठोर कारवाई करावी,” असे त्यांनी स्पष्ट केले.
यासंदर्भात मुक्ताईनगर येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री चाटे व जळगाव पोलीस अधीक्षक यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून आठ दिवसांत ठोस परिणाम दिसावेत, अशा सूचना देण्यात आल्या.
अंतुर्ली येथील सेंट्रल बँकेत प्रचंड गर्दी होत असल्याने महिलांसह खातेदारांना तासंतास प्रतीक्षा करावी लागत असल्याची तक्रार ही यावेळी करण्यात आली. यावर सुशिक्षित बेरोजगारांना पैसे जमा व काढण्यासाठी सेवा केंद्र (पॉईंट) सुरू करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. तसेच काही कर्जदारांची बचत खाती ब्लॉक करण्यात आल्याबाबतही तक्रार करण्यात आली. यावर बँक व्यवस्थापक श्री गोपाळ पाटील यांच्याशी संपर्क साधून तात्काळ तक्रारींचे निराकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

बैठकी दरम्यान शेतकरी व नागरिकांनी विविध समस्या मांडल्या असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.























