मुक्ताईनगर दि .12 (प्रतिनिधी )- नायगाव व पिंप्रीनांदू गावांना जोडणारा रस्ता अस्तित्वात असून ही त्याची योग्य देखभाल न झाल्याने एसटी बसेस गावात न येता बाहेरील मार्गाने धावू लागल्या आहेत. त्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थिनींसह प्रवाशांना दररोज सुमारे अर्धा किलोमीटर पायपीट करून बस पकडावी लागत असून पालक व ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
मुक्ताईनगरहून रावेरकडे जाणाऱ्या एसटी बसेस
नायगाव-पिंप्रीनांदू मार्गे न जाता गावाच्या बाहेरील रस्त्याने जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या मार्गावरील रस्त्याची मागणी जुनी असतानाही त्याची साफसफाई व दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याने दोन्ही गावांतील नागरिकांना बससेवेचा थेट लाभ मिळत नाही.
रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाढले काटेरी झुडपे सुमारे एक किलोमीटर लांबीच्या या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपे वाढली आहेत. त्यामुळे रस्ता अरुंद झाला असून समोरून येणाऱ्या वाहनांना व्यवस्थित जागा मिळत नाही. परिणामी वाहतुकीत अडथळे निर्माण होत असल्याने बस चालकांनी पर्यायी बाहेरील मार्गाचा अवलंब केल्याचे सांगितले जात आहे.

विद्यार्थिनींना सर्वाधिक त्रास
नायगाव व पिंप्रीनांदू येथून मोठ्या संख्येने विद्यार्थी मुक्ताईनगर व रावेर येथे शिक्षणासाठी ये-जा करतात. मात्र बसेस गावात न येत असल्याने विद्यार्थ्यांना गावातून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या पिंप्रीनांदू पुलापर्यंत पायी जावे लागते. विशेषतः विद्यार्थिनींना उन्हाळा, पावसाळा आणि सकाळच्या वेळेत मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
ग्रामस्थांची मागणी
ग्रामस्थांनी संबंधित प्रशासनाने तातडीने रस्त्याची साफसफाई करून झुडपे काढावीत तसेच रस्त्याची दुरुस्ती करून एसटी बससेवा पुन्हा गावातून सुरू करा अन्यथा आंदोलनाचा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे.




















