यावल दि .8 तालुका प्रतिनिधी (मिलिंद जंजाळे ) यावल तालुक्यातील हिंगोणा येथे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुल अर्ज केलेल्या गोरगरीब लाभार्थ्यांची दलालांकडून उघडपणे लूट सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
गावातील काही दलालांनी अर्जदारांना घरकुल मंजुरीसाठी प्रति व्यक्ती 2,000 रुपये आगाऊ व मंजुरीनंतर आणखी 3,000 रुपये अशी तब्बल 5,000 रुपयांची मागणी सुरू केली आहे. या सक्रिय टोळीकडून अनेक गरिब नागरिक आर्थिक शोषणाला बळी पडले आहेत.
शासकीय योजना ही थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी शासन प्रयत्नशील असतानाही, गावात दलालांचे जाळे निर्माण होऊन लाखो रुपयांची लूट होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. प्रशासनाकडून लक्ष न दिल्याने दलालांचे धाडस वाढले असून गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे.
घरकुल अभियंत्याच्या सहभागाची चर्चा
यावल पंचायत समितीतील घरकुल अभियंता चव्हाण यांचा देखील या पैशांच्या मागणीत सहभाग असल्याची चर्चा गावकऱ्यांमध्ये जोर धरत आहे. गोरगरीबांची फसवणूक करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्याचा शोध घेऊन कसून चौकशी करावी व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सर्वत्र होत आहे.
नागरिकांची मागणी
दलाल व संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी.घरकुल प्रक्रिया पारदर्शकपणे राबवावी.गोरगरीब लाभार्थ्यांना त्रास न देता त्यांचा हक्काचा लाभ द्यावा.
ग्राम विकास अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया
ग्राम विकास अधिकारी संजय चौधरी यांनी सांगितले की, “हिंगोणा गावात काही दलाल दोन हजार रुपये घेऊन लाभार्थ्यांना फसवत आहेत. गावकऱ्यांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. घरकुल मंजुरीसाठी शासनाकडे ठरावीक प्रक्रिया आहे, त्यासाठी पैसे द्यायची गरज नाही. अशा टोळीला आळा बसवण्यासाठी गावात दवंडीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे.”
























