यावल दि .15 तालुका प्रतिनिधी ( मिलिंद जंजाळे ) स्वातंत्र्य दिनासारख्या पवित्र आणि राष्ट्रीय अभिमानाच्या दिवशी तालुक्यातील साकळी ग्रामपंचायतीने एक अनोखी आणि इतिहासात नोंद होईल अशी कामगिरी केली. गावातील दिवंगत पाणीपुरवठा कर्मचारी बुद्धवासी चिंतामण टोपलू सुरवाडे यांच्या पत्नी सौ. बेबाबाई चिंतामण सुरवाडे यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालयातील ध्वजारोहण करून लोकनियुक्त सरपंच दिपक पाटील व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी मोठे मन दाखवले.
या अनोख्या उपक्रमामुळे केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात साकळी ग्रामपंचायतीचे नाव आदराने घेतले जाईल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला. १५ ऑगस्ट रोजी ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित या ध्वजारोहण सोहळ्यास गावातील नागरिक, आजी-माजी पदाधिकारी, विविध शासकीय कार्यालयांचे कर्मचारी, समाजसेवक तसेच महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिवंगत चिंतामण सुरवाडे यांनी ग्रामपंचायत पाणीपुरवठा विभागात अनेक वर्षे प्रामाणिकपणे सेवा बजावली होती. त्यांच्या अचानक निधनानंतर ग्रामपंचायतीने त्यांच्या कुटुंबाच्या भावनांचा आदर ठेवत, पत्नी सौ. बेबाबाई यांना या सन्मानासाठी आमंत्रित केले. हा निर्णय गावात सर्वत्र कौतुकास्पद ठरला आहे.
ध्वजारोहणानंतर सरपंच दिपक पाटील यांनी भाषणात सांगितले की, “ग्रामपंचायतीत कार्यरत असलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याचे योगदान अनमोल असते. त्यांच्या कुटुंबीयांना आदर आणि मान देणे ही आमची जबाबदारी आहे. या ध्वजारोहणातून आम्ही त्यांचे स्मरण आणि सन्मान करण्याचा प्रयत्न केला आहे.”
सोहळ्यानंतर राष्ट्रगीत गाऊन सर्वांनी देशभक्तीपर गीतांचा आस्वाद घेतला. यावेळी शालेय मुलांच्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण देशभक्तीमय झाले.
ग्रामस्थ व उपस्थित मान्यवरांनी या ऐतिहासिक उपक्रमाचे मनःपूर्वक स्वागत करत ग्रामपंचायतीचे अभिनंदन केले. साकळी ग्रामपंचायतीचा हा निर्णय पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, यात शंका नाही.
























