यावल दि .21 तालुका प्रतिनिधी ( मिलिंद जंजाळे ) स्वातंत्र्य दिनानिमित्त साकळी ग्रामपंचायतीच्या इतिहासात प्रथमच गावातील दिव्यांग बांधवांसाठी अनोखी योजना राबविण्यात आली. लोकनियुक्त सरपंच दिपक नागो पाटील यांच्या संकल्पने नुसार दि. १५ ऑगस्ट २०२५ रोजी गावातील सुमारे ६० दिव्यांग बंधू-भगिनींना मोफत किराणा किटचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सरपंच दिपक पाटील यांनी भूषविले होते. व्यासपीठावर उपसरपंच नूरबी तस्लीमखान, सर्व ग्रामपंचायत सदस्य, तसेच विविध आजी-माजी पदाधिकारी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
या उपक्रमामागील उद्देश स्पष्ट करताना सरपंच दिपक पाटील म्हणाले, “दिव्यांग बांधवांना समाजात सन्मानाने व सुसह्यपणे जगता यावे, यासाठी हा प्रयत्न आहे. पुढे शासनाकडून दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी ज्या योजना येतील त्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रभावीपणे राबविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
दिव्यांग बांधवांच्या वतीने वासुदेव बडगुजर यांनी कृतज्ञता व्यक्त करत ग्रामपंचायतीचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत नेवे यांनी केले तर आभार प्रदर्शन वरिष्ठ लिपिक बाळकृष्ण तेली यांनी केले.
भावनिक आणि संवेदनशील अशा या उपक्रमास गावातील नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रतिसाद दिला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ग्रामपंचायतीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
























