रावेर (लक्षवेध न्युज नेटवर्क ) दि .1 रावेर नगर परिषदेची हद्दवाढ होऊन तीन ते चार वर्षे उलटली तरी ही नगर परिषदेने रावेर नगर परिषद हद्दीत येणाऱ्या जी.एस कॉलनी, वैदू वाडा, शिक्षक कॉलनी या भागातील रस्ते अजून ही दुरुस्तीला आलेले नाहीत. नागरिकांना साधा मुरुम किंवा गिट्टीचा रस्ता मिळावा, अशी अपेक्षा होती, पण त्याऐवजी या भागातील रस्ते गडद चिखलात परिवर्तित झाले आहेत. परिणामी, येथील रहिवाशांना चिखलातून रस्त्यावरून चढ-उतार करताना मोठी अडचण होत आहे.
नगरपरिषदेच्या हद्द वाढीमुळे या भागात घर कमेटी (टॅक्स ) वसुल केला जात आहे, मात्र मुख्य गरज असलेल्या रस्ते बांधकामाकडे लक्ष दिले गेलेले नाही. येथील रस्त्यांची स्थिती इतकी बिकट झाली आहे की पावसाळ्यात येथील नागरिकांना वाहतुकीसह पैदल फिरणे देखील कठीण झाले आहे. गावठी रस्ते चिखलात बदलल्याने विद्यार्थ्यांपासून तर वृद्धांपर्यंत सर्वांना त्रास सहन करावा लागत आहे.
नागरिकांनी या परिस्थितीबाबत नगरपरिषदेच्या वरिष्ठ अधिकार्यांकडे तक्रारी केल्या असून, रावेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी या कॉलनी परिसराला भेट देऊन थेट पाहणी करावी आणि तात्काळ पर्यायी उपाययोजना कराव्या, अशी मागणी त्यांनी व्यक्त केली आहे.
नगरपरिषद प्रशासनाने नागरिकांच्या त्रासाचा योग्य विचार करून लवकरात लवकर या रस्त्यांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. यामुळे केवळ नागरिकांचा दिवस सुलभ होणार नाही तर नगरपरिषदेच्या कार्यक्षमतेचीही प्रचिती होईल. रावेर सारख्या वाढत्या शहरातील पायाभूत सुविधा या प्रकारे दुर्लक्षित केल्या जाणे नागरीकांच्या हिताच्या विरोधात आहे.
रावेर नगर परिषद हद्दीतल्या जी.एस कॉलनी, वैदू वाडा आणि शिक्षक कॉलनी भागातील रस्त्यांची टिकाऊ आणि दर्जेदार दुरुस्ती होणे अत्यंत आवश्यक आहे. नागरिकांना चिखलातून काढण्यासाठी आणि सुरक्षित वाहतुकीसाठी तात्काळ उपाययोजना कराव्या लागतील. नगरपरिषदेच्या प्रशासनाने या बाबतीत तत्परता दाखवून नागरीकांच्या समस्या दूर कराव्यात, ही अपेक्षा सर्वसामान्यांची आहे. रावेर मधील विकासासाठी रस्त्यांची सोय हा पहिला टप्पा असतो, त्यामुळे त्वरित कारवाई होणे आवश्यक आहे.
























