रावेर दि .17 (प्रतिनिधी )रावेर तालुक्यातील रसलपुर येथील ग्रामपंचायत सदस्यांच्या घरासमोर सांडपाणी साचले असून या समस्येचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हे प्रकरण ग्रामपंचायत कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. विशेषतः अनुसुचित जातीच्या राखीव प्रभागातून बिनविरोध निवडणूक जिंकलेले सदस्य रविंद्र जगन्नाथ तायडे या गंभीर समस्येबाबत खंत व्यक्त करत आहेत.
रसलपुर येथील रविंद्र तायडे यांच्या घरासमोर फेवर ब्लॉक बसविलेल्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात सांडपाणी साचले आहे. हे सांडपाणी अनेक दिवसांपासून तिथे साचलेले असून यामुळे परिसरात दुर्गंधी आणि आरोग्याची समस्या निर्माण होत आहेत. रविंद्र तायडे यांनी म्हटले, “मी ग्रामपंचायत सदस्य असून ही माझ्या घरापुढे घडणाऱ्या या समस्येची ग्रामपंचायत पाहणी करत नाही. जर माझ्या सारख्या सदस्याची किंवा त्याच्या घरासमोरची समस्या दुर्लक्ष केली जात असेल तर सामान्य नागरिकांसाठी परिस्थिती किती बिकट असेल याचा विचार करावा लागेल.
या प्रकरणामुळे ग्रामपंचायतच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित झाला आहे. ग्रामपंचायत सदस्य केवळ नावासाठी आहेत की काय? अशी नागरिकांमध्ये शंका निर्माण झाली आहे. सरपंचांकडून या समस्येकडे दुर्लक्ष केल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी आणि असंतोष वाढत चालला आहे.
सांडपाणी साचल्यामुळे होणारे परिणाम
सांडपाणी साचल्यामुळे परिसरात डास, मच्छरांचा प्रादुर्भाव होतो, त्यामुळे डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका वाढतो. तसेच सांड पाण्याच्या दुर्गंधीमुळे राहणी मानावर ही वाईट परिणाम होत आहे. या समस्येवर त्वरित ग्रामपंचायतने लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.
नागरिकांची अपेक्षा
रसलपुर ग्रामपंचायतने या समस्येवर त्वरित तोडगा काढावा आणि सांडपाणी काढण्यासाठी व्यापक स्वच्छता मोहिम राबवावी, अशी नागरिकांची मागणी आहे. तसेच स्थानिक प्रशासन आणि सरपंच यांना अधिक सक्रिय होऊन समस्या सोडवण्यावर भर द्यावा असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.
रसलपुर येथील सांडपाणी साचण्याचा प्रश्न ग्रामपंचायत सदस्य रविंद्र तायडे यांनी स्पष्टपणे उचल्याने प्रशासनाच्या दुर्लक्षाला मोठा फटका बसला आहे. एका सदस्याच्या घरासमोरचा प्रश्न सोडवण्यात ही ग्रामपंचायत निष्क्रिय राहिल्यास सामान्य नागरिकांची व्यथा काय होईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. ग्रामपंचायतने त्वरित उपाय योजना करुन लोकांच्या आरोग्य आणि स्वच्छतेसाठी योग्य ती पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
























