बारामती दि .1 ( प्रतिनिधी ) माळेगाव नगरपंचायतीच्या भोंगळ कारभारामुळे ढगाईनगर वस्ती गृह परिसरातील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या भागात नळांमधून येणारे पाणी अत्यंत घाणेरडे आणि दुर्गंधीयुक्त असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे. पाणी पिण्यास योग्य नसून त्याचा वापर केल्यास आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.
या परिसरात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा कोणत्याही ठराविक वेळापत्रकानुसार होत नसल्याने नागरिकांना दिवसभर पाण्यासाठी वाट पाहावी लागते. कधी सकाळी, तर कधी रात्री अचानक नळांना पाणी येते. त्यामुळे घरातील महिला, लहान मुले आणि वृद्ध नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
नागरिकांनी सांगितले की, नळातून येणारे पाणी इतके घाण असते की ते वापरण्यायोग्यच राहत नाही. या पाण्यामुळे पोटदुखी, उलटी-दस्त आणि ताप यासारख्या आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. नागरिकांनी अनेक वेळा नगरपंचायतीकडे तक्रारी केल्या, परंतु प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.
नगरपंचायतीच्या निष्क्रियतेमुळे लोकांमध्ये प्रचंड संताप आहे. अधिकारी केवळ आश्वासने देऊन विषय संपवतात, परंतु प्रत्यक्षात काहीही बदल होत नाही. पाण्याची गुणवत्ता तपासली जात नाही आणि त्याच दूषित पाण्याचा पुरवठा सुरू ठेवला जात आहे.
स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणाची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या प्रशासनाला जबाबदार धरणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
नागरिकांनी स्पष्ट केले की, आम्ही कर भरतो, मतदान करतो, पण तरीही आमच्या हक्काचं स्वच्छ पाणी मिळत नाही. हे प्रशासनाचं अपयश आहे. दूषित पाण्यामुळे परिसरात आरोग्याचे प्रश्न गंभीर बनले आहेत.
माळेगाव नगरपंचायतीने तातडीने या प्रकरणाची दखल घेऊन ढगाईनगर वस्ती गृह परिसरात स्वच्छ आणि नियमित पाण्याचा पुरवठा सुरू करावा, अशी सर्व नागरिकांची मागणी आहे. अन्यथा नागरिकांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.























