बारामती दि . 27 प्रतिनिधी ( विश्वजा कदम ) खंडोबानगर, बारामती येथे रविवारी सकाळी घडलेल्या भीषण अपघातात मोटारसायकलवरून जात असलेल्या वडील आणि त्यांच्या दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. भरधाव वेगात असलेल्या टाटा कंपनीच्या हायवा ट्रकने वळणावर मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या घटनेने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृतांची नावे:
1 )ओंकार राजेंद्र आचार्य (वय 37) 2 ) सई ओंकार आचार्य (वय 10)3 ) मधुरा ओंकार आचार्य (वय 4) (सर्व रा. मॅजिक ग्रीनसिटी, खंडोबानगर, बारामती)
घटनेचा तपशील:
मिळालेल्या माहितीनुसार, मयत ओंकार आचार्य हे आपल्या दोन मुलींना मोटारसायकलवरून घेवून घरी येत असताना, महात्मा फुले चौकाजवळील वळणावरून जात होते. याच दरम्यान, भरधाव वेगात आलेल्या हायवा ट्रक (MH 16 CA 0212) ने त्यांना मागून धडक दिली.
हायवा चालक दशरथ दत्तात्रय डोळे (वय 50, रा. भिलारवाडी, ता. करमाळा, जि. सोलापूर) यांनी वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे ट्रक चालविला, अशी तक्रार फिर्यादी अमोल आचार्य यांनी दिली आहे.
पोलीस कारवाई:
या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गु.र.नं. 263/2025 अन्वये BNS कलम 281, 106(1), 125(a)(b), 324(4) आणि मोटार वाहन कायदा 184 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
• दाखल अंमलदार: म.पो.ह.वा. धुमाळ
• तपास अधिकारी: पो.उप.नि. अनिल सातपुते
स्थानिक संतप्त:
अपघाताच्या पार्श्वभूमीवर खंडोबानगर परिसरातील रहिवाशांनी संताप व्यक्त केला असून, चौकातील वळणावर योग्य वाहतूक नियोजन नसल्यामुळे वारंवार अपघात होत असल्याची तक्रार त्यांनी केली.
तातडीने स्पीड ब्रेकर, सीसीटीव्ही आणि ट्रॅफिक नियंत्रण यंत्रणा उभारण्याची मागणी होत आहे.
























