रावेर (लक्षवेध न्युज नेटवर्क ) दि.16 दोन दिवसापासून रावेर तालुक्यातील धामोडी आणि विटवा येथील बोगस घरकुल लाभार्थी प्रकरण गाजत आहे,सदर घरकुल घोटाळा हा तत्कालीन बीडीओ के.पी.वानखेडे यांच्या आततायीपणा मुळे घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
नवल म्हणजे या 50 हून अधिक बोगस घरकुल लाभार्थी यांचे मूळ प्रस्तावच पंचायत समितीला ग्रामपंचायतीने दिलेले नाही.केवळ आधार कार्ड आणि बँकेचे पासबुक या कागदपत्रांवर, त्यांच्या जागेची कसली ही खात्री न करता तत्कालिन बीडीओ के.पी.वानखेडे यांनी वरिष्ठ अधिकारी यांचेकडून पाठ थोपटून घेण्यासाठी अनुदान वितरित केल्याची प्राथमिक माहिती प्राप्त होत आहे.
शासनाच्या घरकुल योजना ग्रामपंचायती मार्फत राबविण्यात येतात ; मात्र ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांचेकडून आवश्यक कागदपत्रे न घेता लाभ मंजूर करणे,लाभार्थींच्या खात्यावर त्यांच्या बांधकामाची खात्री न करताच अनुदानाचे हप्ते वितरित करणे,असे प्रकार रावेर पंचायत समितीत घडत असल्याचे चित्र दिसून येत आहे.रावेर पंचायत समितीचा घरकुल विभाग यास जबाबदार असल्याचे नाव न सांगण्याच्या अटीवर काल पंचायत समितीची मीटिंग आटोपून घरी जातांना तालुक्यातील बहुतांशी ग्रामपंचायत अधिकारी खाजगीत बोलत होते.
आधीच शौचालय घोटाळ्यामुळे रावेर पंचायत समिती बदनाम झाली आहे,आणि आता घरकुल घोटाळा बाहेर येत असल्याने पंचायत समिती प्रशासनाचे करावे तरी काय,असा तालुकावासीयांना प्रश्न पडला आहे.
सदर प्रकरणी आ.चंद्रकांत पाटील यांनी लक्ष घालण्याची मागणी त्यांच्या मतदारसंघातील ही दोन्ही गावे असल्याने होत आहे.























