यावल दि . 12 तालुका प्रतिनिधी ( मिलिंद जंजाळे ) यावल तालुक्यातील आंबापाणी येथील अंगणवाडी सेविका पदाच्या भरती प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. स्थानिक आदिवासी महिलेला वगळून बाहेरील उमेदवाराची निवड केल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.
पँथर व भिम आर्मी कार्यकर्ते सतिष अडकमोल यांनी यावल पंचायत समिती एकात्मिक महिला बाल विकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हरिपूरा येथील उमेदवाराला निवड देताना भरती नियमांचे उल्लंघन करण्यात आले. हरिपूरा येथून निवड झालेल्या महिलेला नियुक्त शाळेमध्ये प्रशिक्षण मिळाल्याचे सांगितले जात असले तरी, त्या शाळेतील शिक्षक पदावर कार्यरत असल्याने त्यांचे वास्तव्य गावाबाहेर आहे. तसेच हरिपूरा हे आंबापाणीपासून 14 किलोमीटर अंतरावर असून, रोजचा प्रवास करणे शक्य नसल्याने ही निवड स्थानिक हिताच्या विरोधात असल्याचा आरोप आहे.
गावातील आदिवासी महिलेला या पदासाठी प्राधान्य द्यावे, असा नियम असूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने प्रशासनाने चौकशी करून न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली असुन कार्यवाही न झाल्यास व आदिवासी महिलेला न्याय न मिळाल्यास स्वतंत्र दिनी दि. 15 ऑगस्ट रोजी यावल पंचायत समितीच्या आवारात आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे सतिष अडकमोल यांनी सांगितले आहे. तर या प्रकरणाची चौकशी होऊन दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी गावकऱ्यांची मागणी आहे.
याबाबत महिला बाल विकास अधिकारी अर्चना आटोळे यांच्या शी संपर्क साधला असता त्यांनी दिलेल्या माहिती नुसार आंबा पाणी येथील सेविका भरतीची अजून फक्त प्राथमिक यादी लागलेली आहे अंतिम निवड यादी 29 तारखेला लागणार त्या यादीवर जर कुणाची हरकत असेल तर त्यांनी ती रीतसर हरकत लेखी स्वरुपात कार्यालयात देणे आवश्यक आहे त्यावर योग्य ती कार्यवाही केली जाईल असे सांगितले आहे.
























